
वाई : बलकवडी धरणासाठी उळूंब ग्रामस्थांना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागला. इथल्या भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी वणवण फिरावे लागत आहे. पुनर्वसनाच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात फळबाग लागवड आणि मासेमारी करण्यास वाव आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या भागातील तरुणांना उपजिविकेसाठी मदत होणार आहे. शासन पातळीवर याकरिता मदत उपलब्ध झाल्यास नोकरीसाठी परगावी गेलेले तरुण तरुणी पुन्हा गावाकडे येतील असा ठाम विश्वास उळूंब ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकताच उळूंब गावचा गाव भेट दौरा केला. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. औपचारिकतेला फाटा देत जिल्हाधिकारी साहेबांनी शासनाच्या वतीने ग्रामस्थांचे स्वागत करत थेट जमिनीवरच बसून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
याप्रसंगी गावचे युवा उद्योजक, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन समितीचे सदस्य संतोष कळंबे यांनी ग्रामस्थांच्या अडचणींची माहिती दिली. धरणासाठी त्याग केलेल्या ग्रामस्थांना इथेच रोजगाराची संधी प्राप्त व्हावी अशी मागणी त्यांनी केली. धरणासाठी जमिनी गेल्याने शेतीसाठी जमीन उपलब्ध नाही. शासनाने संपादित केलेली सुमारे 350 एकर जमीन तशीच पडून असून या जागेवर बांबू लागवड अथवा फळबाग लागवडीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. धरणाच्या पाण्यात मासेमारीला वाव आहे. इथे बोटिंगचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जावे असेही त्यांनी सुचवले. दिलीप वाडकर यांनीही विविध दाखले मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. पुनर्वसनाचे दाखले मिळाल्यास नोकरीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या समस्या बारकाईने समजून घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. महिलांनी बचतगट स्थापन करून त्याच्या माध्यमातून शासकीय मदतीचा लाभ घ्यावा असे त्यांनी सुचवले. बांबू लागवड आणि फळबागा विकसित करणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याप्रश्नी मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मासेमारी आणि बोटिंग संदर्भात जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी केली. वारसनोंदी, खातेफोड, पुनर्वसन दाखले, रेशनिंग कार्ड आणि इतर अनुषंगिक दाखले झटपट मिळावेत यासाठी गावात शिबिर घेण्यात यावे अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी कब्जापट्टी आणि इतर दाखल्यांचे वाटप जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने धोम बलकवडी धरणाचे विहंगम दृश्य असलेली फोटो फ्रेम जिल्हाधिकारी यांना भेट देण्यात आली. यानिमित्त अशोक येवले, तेजस्विनी पोरे, मच्छिंद्रनाथ नलवडे, नानासाहेब कदम आणि सहकलाकारांनी सुरेल हिंदी मराठी गाणी सादर केली. कार्यक्रमास नायब तहसीलदार वैभव पवार, निवासी नायब तहसीलदार धनश्री यादव, महसूल नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर, मंडल अधिकारी विश्वनाथ कांबळे, पुरवठा निरीक्षक समीर मिर्झा, आदींसह ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दुर्गम भागातील उळूंब गावाला भेट दिल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थांबरोबर पंगतीत बसून साहेबांनी भोजनाचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी साहेब आणि वाई महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गाव भेट दौऱ्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास पात्र ठरला.




