वाई : शाळा आणि मळा यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता पालक आणि शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी कृषी शिक्षणाची निवड करावी. कृषी क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ञ अरुण आदलिंगे यांनी केले.
वाई तालुक्यातील बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या शुभचिंतन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक चिंतामणी काटवटे (आयटीआय निदेशक सातारा) होते. यावेळी श्री. धनंजय हेंद्रे (उपनिदेशक आयटीआय सातारा ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आदलिंगे म्हणाले, मुलांनी नाचण्याकडून वाचण्याकडे आले पाहिजे. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर प्रकृती सुधारते त्याप्रमाणे महान संतांची चरित्रे वाचनात आल्यावर संस्कृती सुधारते. देशाप्रती कर्तव्य भावना जपली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. चिंतामणी काटवटे यांनी आयटीआय क्षेत्रातील नवीन कोर्सेस आणि उपलब्ध नोकरीच्या संधी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दादासाहेब बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु, अंजली बाबर हिने केले तर स्वागत कु. अंकिता पवार हिने केले. यावेळी श्री. शंकर दगडे, सौ. शिंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीतील विद्यार्थी साईराज खरात याने आभार मानले.






