पुणे : कवयित्री शोभा करंडे यांच्या ‘शोभावतरंग’
या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सदाशिव पेठ येथील राष्ट्र सेवा दलाच्या बॅ.नाथ पै.सभागृहात निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष पपीचंद श्रीश्रीमाळ यांचे हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ. नीनादेवी देसाई होत्या.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मंदाताई नाईक, सवंगडीच्या सल्लागार उषाताई जोईल, दिलीप धायगुडे, अरुण बुलाख आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रसेवा दल, निळू फुले कला अकादमी आणि एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आयोजित ‘गप्पांगण’ या कार्यक्रमाअंतर्गत हे प्रकाशन करण्यात आले.
“कविता ही कविची अंत:स्फूर्ती असून, शोभा करंडे यांची कविता समाज व कुटुंबातील विसंगतीवर भाष्य करत वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधते.” या शब्दांत श्रीश्रीमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात सौ. देसाई यांनी कवयित्री शोभा करंडे यांच्या कवितांचा आशय स्पष्ट केला. कवयित्री दीपा पराडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
आपल्या मनोगतात कवयित्री करंडे यांनी कविता स्फुरते कशी सांगत अनेकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थितांचे आभार मानले.
प्रारंभी शैलाताई पाटील, रेखा गुप्ते आणि उर्मिला घाटपांडे यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन कवी लक्ष्मीकांत रांजणे यांनी केले.
प्रकाशन समारंभास सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे तसेच एकपात्री कलाकार परिषद व निळू फुले कला अकादमीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशनाच्या आधी ‘ विक्रम वेताळ’ या एकांकिकेचा प्रयोग झाला. यामध्ये लक्ष्मीकांत रांजणे यांच्या अभिनयाची झलक पहावयास मिळाली. पुण्याच्या साहित्यिक वर्तुळात वाईचा लौकिक वाढवण्याचे काम श्री. रांजणे यांच्या माध्यमातून होत आहे.






